गर्दी तर जमली….

सभेला जमणारी गर्दी आणि प्रत्यक्ष मतदान यांचा परस्परांशी संबंध नसतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळेच की काय प्रचार सभांचे प्रमाण कमी होत चालले आहे. मोजक्याच सभा घ्यायच्या आणि बाकी अन्य माध्यमांचा उपयोग करुन मतदारांपर्यंत पोहोचण्याची नीती सर्वच राजकीय पक्ष अवलंबिताना दिसतात. असे असले तरी महायुतीतर्फे श्री. देवेंद्र फडणविस आणि श्री. एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांनी सभा घेण्याचा सपाटा लावला होता. तुलनेने महाआघाडीच्या सभा झाल्या नाहीत. त्यामागे अनेक कारणे असतात. नेत्याच्या वक्तृत्वावर त्याची गर्दी खेचण्याची क्षमता अवलंबून असते. असे वरदान लाभलेले नेते दुर्मिळ होत चालले आहेत. अर्थात राज ठाकरे त्यास अपवाद आहेत. गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक शैली स्वीकारुन सभांना गर्दी जमवली. असे असले तरी या दोघांनी महापालिका निवडणुकीत मोजक्याच सभा घेतल्या. त्यापैकी सोमवारी एक ठाण्यात झाली आणि तिला प्रतिसादही चांगला मिळाला. सहाजिकच या गर्दीचा मतदानावर कसा परिणाम होईल यावर चर्चा सुरु झाली.

ठाकरे बंधू एकत्र येणे या निवडणुकीचा उत्सुकतेचा विषय आहे. त्यामुळे गर्दीचे एक कारण हे असू शकते. सहसा ही गर्दी बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या जुन्या निष्ठावंतांची होती. त्यामुळे ही मते उद्धव ठाकरे सेना (युबीटी) आणि मनसेच्या पारड्यातच पडणार यात वाद नाही. जे या दोन्ही पक्षाचे अनुयायी नाहीत. परंतु त्यांना मराठी माणसाच्या भवितव्याची चिंता वाटते असे किती होते हे सांगता येणार नाही. त्याचे आणखी एक कारण सभेचे थेट प्रक्षेपण झाल्यामुळे घराघरात बसलेले मतदार या भाषणांना कोणता प्रतिसाद देतात हे पहावे लागेल. एक नक्की की दोघा भावांची भाषणे भावनिक पातळीवर सरस होती, परंतु भावनांना वृत्तीचा सबळ आधार द्यावा लागतो, ती जमीन कसायला उशीर झाला असेच म्हणावे लागेल. जुलै महिन्यात त्यांचे अधिकृत मिलन झाले, पुढे चार-पाच महिने जमिनीची मशागत व्हायला हवी होती. तसे झाले नाही. त्यामुळे मराठी माणसाला मतदानाला जाण्यापूर्वी जेमतेम 48 तास मिळतात आणि तेवढ्यात त्यांना शिंदे की ठाकरे असा निर्णय घ्यायचा आहे.

काही झाले तरी ठाण्यात शिवसेनेचा प्रभाव आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्याचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे आव्हान आहे. त्यांनी सर्व प्रतिष्ठा पणला लावली आहे. त्यावर मात करायची असेल तर उबाठा आणि मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्यासाठी या 48 तासांत जीवाचे रान करावे लागणार.