* प्रस्ताव मंजुरीनंतरही ठाणे स्थानकाचा विकास कागदावरच
* खासदार नरेश म्हस्के यांनी महाप्रबंधकांना खडसावले
* जनआंदोलनाचा दिला इशारा
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी विकास आराखडा मंजूर होऊन त्याचा ९५० कोटींचा प्रस्ताव रेल्वे प्राधिकरणाला पाठवून देखिल या कामाला सुरुवात न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी खडसावले तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकातील विकासकामे तत्काळ पूर्ण करा, अन्यथा जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मुलभूत सोयीसुविधा देण्यात मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खा. श्री. म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेतली होती त्यामध्ये खा. श्री म्हस्के यांनी नाराजी व्यक्त केली. आरएलडीएच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी डीपीआर मास्टर प्लॅनच्या माध्यमातून ९५० कोटी रुपयांचा प्रस्ताव २६ मे २०२३ रोजी रेल्वे प्राधिकरणाने पाठविला आहे. मी निवडून आल्यापासून या विकासकामासाठी नियमित पाठपुरावा करत आहे. मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरु न झाल्याबद्दल खा. श्री. म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीला डीजीएम के. के. मिश्रा, डीआरएम हरीश मीना, एस. एस. गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबईच्या (सीएसएमटी) दिशेने जाणाऱ्या फलाट क्रमांक १० वरुन मोठ्या संख्येने महिला वर्ग प्रवास करत असतात. फलाटावर छत नसल्याने पावसाळ्यात महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब महाप्रबंधकांच्या निदर्शनास खा. श्री. म्हस्के यांनी आणून देत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याची सूचना केली. ठाणे ते मुंबई (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या फलाटावर अजून एक पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे. हा पादचारी पूल फलाट क्रमांक १ ते फलाट क्रमांक ७ आणि ८ नंबरला पूर्व आणि पश्चिम असा जोडला जाईल. ते काम तातडीने सुरु करावे. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ५ ते फलाट क्रमांक १० ला जोडणाऱ्या पादचारी पूलाच्या पुनर्बांधणीचे काम अपूर्ण असून ते तत्काळ मार्गी लावावे. वर्तकनगर येथील आरक्षण केंद्रात एक शौचालय (पुरुष/महिला) बांधावे. केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरक्षण केंद्राचे नूतनीकरण करावे. नव्याने वायरिंग, खिडक्या दुरुस्ती, रंगरंगोटी, बैठक व्यवस्था इत्यादी कामे त्वरित पूर्ण करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सूचना खा. श्री. म्हस्के यांनी बैठकीत केली.
सिडको प्रशासनाने नवी मुंबईमधील रेल्वे स्थानकांची निर्मिती केली आहे, तर रेल्वे प्रवासी सेवा मध्य रेल्वे देत आहे. या दोन्ही प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कित्येक वर्ष येथील रेल्वे स्थानकांची सुधारणाच झालेली नाही. स्थानकांतील दुर्दशेमुळे प्रवाशांना नाहक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे आजवर कोणाचेच लक्ष गेले नव्हते ही दुर्दैवाची बाब खा श्री. म्हस्के यांच्या निदर्शनास आली. निवडून आल्यापासून खा. श्री. म्हस्के यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा करत आहेत. आजच्या बैठकीत रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मिना आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी दुरध्वनीद्वारे खा. श्री. म्हस्के यांनी संभाषण करून देत चर्चा केली. येथील प्रवासी माझ्याशी सोयीसुविधा देण्यासाठी वारंवार संपर्क करत आहेत. मात्र दोन्ही प्राधिकरणात समन्वय नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत. यावर मार्ग न निघाल्यास कायदा हातात घेऊन आंदोलनाचा इशारा खा. श्री. म्हस्के यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना दिला. यावर दोन्ही अधिकाऱ्यांनी या आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन प्रवाशांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
दिघा रेल्वे स्थानक ते वाशी रेल्वे स्थानक दरम्यानच्या (दिघा, ऐरोली, सानपाडा) स्थानकांतील सोयी सुविधा आणि सुधारणांसाठीही खा. श्री म्हस्के यांनी सूचना केल्या. मध्य रेल्वे, मुंबई विभागाने दिघा ते ठाणे स्थानकादरम्यानच्या ट्रकच्या अप-डाऊन लाईनवरील वर आणि खाली जाणाऱ्या जुळ्या (फक्त दुचाकी/तीन चाकी वाहनांसाठी) भुयारी मार्गांसाठी प्रस्ताव पाठवला आहे. हे भुयारी मार्ग लवकरात लवकर होणे आवश्यक असून भुयारी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना ट्रॅक ओलांडावा लागत असून अपघात होत असल्याची गंभीर बाब खा. श्री म्हस्के यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली.
दिघा रेल्वे स्थानकात छत, पंखे, दिवे आणि ध्वनिक्षेपकाची दुरुस्ती, रेल्वे स्टेशन बाहेर ब्लॉक बसविणे, तसेच दिघा, ऐरोली आणि कोपरखैरणे या स्थानकांवर एस्कलेटरची सुविधा, ऐरोली स्थानकावर आरक्षण खिडकी सुरू करणे, रबाळे पश्चिमेकडील तिकीट खिडकी रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवणे, सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे काम पुन्हा सुरू करण्याची सूचना खा. श्री म्हस्के यांनी केली. वाशी ते बेलापूर, तुर्भे ते ऐरोली आणि बामनडोंगरी ते खारकोपर या सर्व रेल्वे स्थानकांवरील रेल्वे फलाट, रेल्वे कार्यालयांच्या आजूबाजूचा परिसराची सुधारणा करणे आवश्यक असल्याची बाब खा. श्री. म्हस्के यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.