एमआयडीसी निवासीमध्ये रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी हे अस्वच्छतेचे आगर झाले असून उन्हाळा असूनही डासांचे प्रमाण वाढले आहे. ड्रेनेज वाहिन्या, चेंबर फुटले असून नाल्यात कचरा साचून सांडपाणी तुंबले आहे. परिणामी रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
निवासी भागातील एमआयडीसीच्या ड्रेनेज वाहिन्या, चेबर्स चाळीस वर्षे अधिक जुन्या झाल्याने त्या जागोजागी फुटल्या आहेत. त्याचे सांडपाणी हे पावसाळी गटारात आणि नाल्यात तुंबून राहत आहे. नवीन पावसाळी गटार, नाल्याची आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे ही एमआयडीसी ठेकेदारांकडून चालू आहेत. या कामामुळे काही ठिकाणी सांडपाणी अडले गेले आहे. त्यात हे नाले कचरा, प्लास्टिकने भरले आहेत. यातूनच काही ठिकाणी जलवाहिन्या गेल्या आहेत.
निवासी भागातील मध्यवर्ती भाग असलेला कावेरी चौक, ओमकार स्कुल, एकदंत हेरिटेज, कोयना, हर्षवर्धन सोसायटी या परिसरातील मोठ्या नाल्यांचे कामे मंदगतीने चालू आहे. एकदंत व कोयना सोसायटी यांच्या मधून जाणाऱ्या मोठ्या नाल्याचे काम दोन महिन्यांपासून थांबले आहे. त्यामुळे तेथून जाणारे नाल्याचे पाणी पुढे जात नाही. याच नाल्यातून पुढे हे पावसाळी पाणी व सांडपाणी एमआयडीसी फेज दोनकडील मोठ्या नाल्यात जाते. असेच इतर नाल्यातील पाणी अनेक ठिकाणी अडत असल्याने निवासी भागामधील नाले तुंबून राहत आहेत. त्यामुळे जिकडे तिकडे अस्वच्छता व डासांची पैदास वाढली आहे. यामुळेच निवासी भागातील दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची वाढ झालेली पाहवयास मिळत आहे. बेसुमार डास वाढीमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया इत्यादी आजार वाढू शकतात,अशी भीती येथील रहिवासी डॉ. रेखा फणसे यांनी व्यक्त केली आहे.