ठाणे : कळवा परिसरातील अधिकृत इमारतीमधील रहिवाशांनी क्लस्टर योजनेस विरोध सुरू केला असून या रहिवाशांनी ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर क्लस्टर नको असे बॅनर इमारतीवर लावले आहेत.
नंदराज, अक्षय, मंगलदीप, न्यू राजदीप, राजस, न्यू पंचदीप, अवंती, निसर्ग, एकमत अशा सोसायट्यांचा समावेश आहे. क्लस्टर योजनेमुळे इमारतींचा पुनर्विकास लवकर होणार नाही आणि नागरिकांना लवकर हक्काचे घर मिळणार नाही. त्यामुळे क्लस्टर योजनेस विरोध असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यावर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केले असून त्यात जनतेने ठरवले की ठरवले… क्लस्टर म्हणजे लूट कळवेकरांचे अभिनंदन, असे त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील धोकादायक आणि बेकायदा बांधकामांमध्ये जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या योजनेत सहभागी होण्यास अधिकृत इमारतीमधील रहिवाशांकडून विरोध होत असतानाच, आता ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कळव्यातील रहिवाशांनी क्लस्टर नको असे बॅनर इमारतीवर लावले आहेत. क्लस्टर योजनेस मानपाडा भागातील झोपडपट्टी वासीयांनी यापूर्वी विरोध केला होता. घरावरील सर्व्हे क्रमांक पुसून टाकले होते. तसेच अधिकृत इमारतधारकांकडून योजनेस विरोध होत आहे. म्हाडातील रहिवाशांनी प्रकल्पास विरोध केला होता. ठाणे शहरातील भीमनगर, पवारनगर आणि विवेकानंदनगर या परिसरात म्हाडाच्या मालकीची जमीन मोठ्या प्रमाणात आहे. या जमिनीवर ‘म्हाडा’ने बैठ्या तसेच इमारतींच्या माध्यमातून वसाहती उभ्या केल्या आहेत. त्यात हजारो नागरिक वास्तव्य करीत आहेत. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या ४९ नागरी पुनरुत्थान आराखड्यांमध्ये या भागांचाही समावेश आहे. परंतु येथील जागा ‘म्हाडा’च्या मालकीची असल्यामुळे पालिकेला या ठिकाणी क्लस्टर योजना राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे पालिकेने येथील १९.९७ हेक्टर (४९.३५ एकर) इतकी जागा भाडेतत्त्वावर देण्याकरिता ‘म्हाडा’कडे ना हरकत पत्र मागितले. त्यास म्हाडा रहिवाशांनी आंदोलन करत विरोध केला होता.