१५० मीटर रस्ता फेरीवालामुक्त करण्याची शिवसेनेची मागणी
ठाणे: दिवा स्टेशन पूर्व परिसरात होणारी वाहतूक कोंडी सर्वश्रुत असून स्टेशन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फेरीवाल्यांमुळे व बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना येथून मार्ग काढणे कठीण झाले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतरही स्टेशन परिसर कोंडीमुक्त करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिवा शहरात स्थायिक झालेला बहुतांशी नागरिक हा मध्यमवर्गीय असल्याने ९० टक्केपेक्षा जास्त नागरिक रेल्वेने प्रवास करतात. परिणामी दिवा स्टेशन परिसर नेहमी गजबजलेला असतो. रेल्वे स्थानकात होणारी गर्दी व रेल्वे परिसरात रिक्षा, बस व लहान-मोठे व्यापार करणारे व्यापारी यामुळे येथे नेहमीच अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे उच्च न्यायालयाने या संदर्भात कठोर आदेश देऊन मध्य रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर परिसर हा फेरीवाला मुक्त, ट्रॅफिक मुक्त ठेवावा असे स्थानिक प्राधिकरणाला निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने दिवा स्टेशन परिसर फेरीवाला व ट्रॅफिक मुक्त ठेवण्यासाठी १५० मीटर परिसरातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख ॲड. आदेश भगत यांनी सहायक आयुक्त यांच्याकडे केली आहे.
दिवा स्टेशन पूर्व परिसरात उड्डाण पुलासाठी उभ्या करण्यात आलेल्या शेवटच्या पिलरजवळ रस्ता अरुंद झाला असून त्या पिलरपासून दिवा चौकापर्यंत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना मागे जाण्याचे निर्देश देऊन तिथे रस्ता करावा जेणेकरून त्या भागात वाहतूक कोंडी होणार नाही व नागरिकांना येण्याजण्यास कोणताही अडथळा होणार नाही अशी मागणी देखील श्री. भगत यांनी केली आहे.