राजस्थानी बांधवांना ठामपा निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी

ठाणे : ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली असून हिंदू संस्कृतीला प्राधान्य देत भाजप आणि शिवसेनेला कायम पाठिंबा देत आले आहेत. त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत किमान पाच राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राजस्थानी विकास मंच महाराष्ट्र आणि राजस्थान प्रगती मंडळ, ठाणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
गेल्या काही वर्षांत ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून सुमारे १२ ते १३ टक्के लोकसंख्या या समाजाची ठाणे शहरात आहे. राजस्थानची परंपरा आणि हिंदू सनातन संस्कृती जपत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षाशी निष्ठा ठेवून कायम त्यांच्या समर्थनात उभे राहिले आहेत. स्थानिक निवडणुकांसह, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कायम तन, मन आणि धन अर्पण करून या पक्षांचे काम करत आले आहेत, अशी माहिती राजस्थान प्रगती मंडळ, ठाणेचे अध्यक्ष राकेश मोदी आणि राजस्थान विकास मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष कपूर रामावत यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
दोन्ही संस्थांनी ३० मार्च २०२५ रोजी आयोजित केलेल्या राजस्थान महोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार ठाणे महापालिका निवडणुकीत किमान पाच राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राकेश मोदी आणि कपूर रामावत यांनी केली आहे.