अंबरनाथला पदपथांवर अंधार; खराब रस्ते, कचऱ्याची समस्या गंभीर

भाजपा ठोकणार नगरपालिकेला टाळे

अंबरनाथ: अंबरनाथ शहरात रस्त्यांवरील बंद पथदिवे, खराब रस्ते, कचऱ्याची समस्या याबाबत नगरपालिकेला वारंवार तक्रारी, निवेदने देऊनही ठोस कार्यवाही झाली नसल्याच्या निषेधार्थ अंबरनाथ नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा अंबरनाथ भाजपच्या वतीने भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अंबरनाथ शहरातील नागरिक पालिका प्रशासनाच्या गैरकारभारापासून समस्यापासून वंचित आहेत, समस्यांची सोडवणूक व्हावी यासाठी मागील महिन्यात प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष विश्वजित करंजुले-पाटील, प्रजेश तेलंगे आणि लक्ष्मण पंत तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, तरीही नागरी समस्यांची सोडवणूक झाली नसल्याचे करंजुले यांनी सांगितले.

गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले, पण त्याची पूर्तता झाली नाही. रस्त्यावरील खड्डे, बंद पथदिवे यामुळे अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, कचऱ्याची समस्या सुटू शकली नाही, शहरात बहुतेक ठिकाणी राज्य विद्युत मंडळाच्या खांबांवर पथदिवे झळकल्याचे दृष्टीला पडते, मग पालिकेचे खांब आहेत कुठे असा सवाल करंजुले यांनी उपस्थित केला.

नगरपालिकेत सुरु असलेल्या गैर कारभाराला लगाम घालण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. गलथान कारभाराच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा निर्धार करण्यात आल्याचे श्री. करंजुले यांनी दिला. पश्चिम मंडळ शहराध्यक्ष लक्ष्मण पंत, दिलीप कणसे, खानजीभाई धल, रुपाली लट्ठे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.