दहिसर-मीरा भाईंदर मेट्रोची जुलैमध्ये होणार चाचणी

भाईंदर  : दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९चे काम अंतिम टप्प्यात म्हणजे जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात मेट्रोची चाचणी घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या टप्प्याचा वापर सुमारे ३३ हजार प्रवासी करत आहेत. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर वर्षअखेरीस ही सेवा उपलब्ध होणार आहे.

चाचणी यशस्वी झाल्यानंतर आवश्यक परवानग्या प्राप्त करून ही मार्गिका वर्षअखेरीस नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमधून मुंबईकडे नियमित प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

मेट्रो मार्गिका ९चा पहिला टप्पा एप्रिल महिन्यात दहिसर ते काशिगावदरम्यान प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. या सेवेचा लाभ दररोज सुमारे ३३ हजार प्रवासी घेत आहेत. सध्या काशिगाव ते सुभाषचंद्र बोस मैदान या अंतिम टप्प्याचे काम सुरू असून ते सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यात विद्युत वाहिन्या अंथरणे, स्थानक परिसराचा विकास तसेच अन्य तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे पूर्ण होताच जुलैच्या पहिल्या आठवड्यात मेट्रोची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.