सर्वसामान्य रहिवाशांना होईल लाभ-मिराणी
ठाणे : मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी हा ठाणेकरांसाठी अत्यंत संवेदनशील विषय बनला असून हे प्रकल्प मार्गी लागण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी क्रेडाई एमसीएचआय यांनी ‘रिहॅब-एक्स्पो’ असा दोन दिवसांचा विशेष कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती अध्यक्ष सचिन मिराणी यांनी दिली.
‘ठाणेवैभव’शी बोलताना श्री. मिराणी म्हणाले की या प्रश्नांचे गांभीर्य आणि आवाका प्रचंड असून हजारो कुटुंबांच्या सुरक्षित घराचे स्वप्न त्यावर अवलंबून आहे. या प्रश्नातील गुंता वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने सरकारी संस्था, उदाहरणार्थ सहकार निबंधक कार्यालय, ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचा संबंध येतो. या खात्यांचे अधिकार आणि त्याबाबत कागदपत्रांची पूर्तता याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे. बऱ्याच गोष्टी किरकोळ वादातून निर्माण होतात, तिथे सामंजस्याची भूमिका कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन तज्ज्ञमंडळी करतील.
श्री. मिराणी यांच्या मते ठाणे शहरात (जुन्या) सुमारे तीन हजार इमारतींचे पुनर्बांधकाम विविध कारणास्तव अडकले आहे. कोलशेत, बाळकूम, वर्तकनगर, पोखरण रोड आणि काही प्रमाणात घोडबंदर रोडवरील इमारतीही पुनर्बांधकामाच्या कक्षेत आल्या आहेत, असे ते म्हणाले.
क्रेडाई-एमसीएचआय समन्वयाची भूमिका घेणार असून विकासकांना, रहिवाशांना, आणि सरकारी यंत्रणांना एका छताखाली आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असेही श्री. मिराणी यांनी सांगितले.