ठाण्यात शरद पवार गटाला काँग्रेसचा ४८ तासांचा अल्टीमेटम

काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाही-विक्रांत चव्हाण

ठाणे: ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीचे अद्याप अधिकृत जागावाटप झालेले नाही. असे असताना कळवा प्रभाग क्रमांक नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने रॅली काढून उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे हे वर्तन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नसुन आघाडीत ‘बिघाडी’ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वर्तन सुधारण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम ठाणे काँग्रेसने दिला आहे.

बुधवारी काँग्रेस मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, कार्यालयीन सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी,राजू शेट्टी उपस्थित होते.

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक जाहिर झाली असून ३३ प्रभागांमध्ये काँग्रेसकडे १३१ उमेदवार आहेत. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याने महायुतीच्या विरोधात कडवी लढत देण्यासाठी सज्ज आहे. जागावाटपात काँग्रेसने ३५ जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र आघाडीचे जागावाटप झालेले नाही, किंवा त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणाही झालेली नाही. असे असताना आघाडीतील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परस्पर आपला उमेदवार जाहिर करते हे आघाडीच्या भवितव्याला पोषक नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजीत पवार यांनी पक्षाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅली काढुन परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कृती विरोधात काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.

आघाडीतील पक्षाने स्वतःच्या पक्षाचा उमेदवार म्हणुन उमेदवारी दाखल केली असती तर चालले असते, अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म दिलेला नाही. तरी अशा प्रकारे अभिजीत पवार यांनी स्वतःला मविआ आघाडीचा उमेदवार घोषीत करून जाहिर रॅली काढणे कितपत योग्य आहे. या रॅलीला राष्ट्रवादीचे नेते, आणि शहर अध्यक्ष कसे जातात? असा सवाल करून विक्रांत चव्हाण यांनी, आघाडीतील अन्य घटकपक्षांना खडे बोल सुनावले.

या आधी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दहावेळा फोन करून बोलावले तेव्हा तन मन धनाने काम केले. काँग्रेसचा वापर करून घेतला आणि आता कार्यकर्त्याना न्याय देण्याची वेळ असताना असा सवतासुभा मांडणे चुकीचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या आगळीकीमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कळव्यात राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी झाली आहे. मुंब्र्यात राष्ट्रवादीची बी टीम महायुतीसाठी काम करीत आहे, कळव्यात आमच्याकडे चार चार उमेदवार तयार असून तेवढे मतदारही आहेत तेव्हा, काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाही, असे ठणकावत विक्रांत चव्हाण यांनी ४८ तासात राष्ट्रवादीने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा, यांची संस्थाने खालसा व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देत काँग्रेसकडे स्वबळावर लढण्याचा शेवटचा पर्याय असेल, असेही विक्रांत चव्हाण यांनी निक्षुन सांगितले.