आयोगाचा निर्णय घातक – उद्धव ठाकरे

मुंबई : निवडणूक आयोग हे केंद्र सरकारच्या हातचे बाहुले असून त्यांनी दिलेला हा निर्णय लोकशाहीला घातक आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसैनिकांनो, मी खचलो नाही, तुम्हीही खचू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावे, त्याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णायाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

कदाचित एक दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागतील. त्यांना मुंबईला भिकेला लावून दिल्लीश्वरांच्या दारात उभे करायचं आहे. शिवसेना लेचीपेची नव्हती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राजमान्यता मिळाली तरी चोर हा चोरच असतो, असा टोला त्यांनी लगावला. हिंमत असेल तर निवडणुका घ्या, शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाणाचं तेज जनता मिंधे गट आणि भाजपला नक्कीच दाखवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार आहे. नामर्द कितीही मातला तरी मर्द होऊ शकत नाही. राजमान्यता मिळाली तरी चोर हा चोरच असतो. चोराला चोरी पचणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

यंत्रणांचा वापर करून जेवढा आमच्यावर अन्याय कराल त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. कोर्टातील निकालापर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देणं चुकीचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकशाहीचं वस्त्रहरण होत असलेलं आम्ही खपवून घेणार नाही. अनेक घटना तज्ज्ञांनी सांगितलं आहे की 16 आमदार अपात्र ठरतील. परंतु, न्यायालयाच्या निकाला आधीच हा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.