ठाण्यात नालेसफाईला अद्याप सुरुवातच नाही
ठाणे : रंगरंगोटीच्या कामात व्यस्त असणाऱ्या ठाणे महापालिकेने पावसाळा तोंडावर असतानाही नालेसफाईला अद्याप सुरुवात केलेली नाही. त्यामानाने नवी मुंबई महापालिकेने मात्र ६५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण केली आहेत.
नवी मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे काम 65 टक्के टक्के पूर्ण झाले आहे. असे असताना रंगरंगोटीत रंगलेल्या ठामपाने मार्च महिन्याअखेर निविदा काढली आहे. तर या कामाला 1 ते 7 मे दरम्यान सुरुवात होणार आहे. पण पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नालेसफाईची कामे काही पूर्ण होणार नाहीत, पहिल्या पावसातच रस्त्यावर टाकण्यात येणारा गाळ नाल्यात वाहून जात नालेसफाईच्या नावावर हातसफाई करण्याचे काम ठेकेदारांकडून होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
यंदाच्या वर्षी देखील पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे नियोजित कालावधीत व्हावी यासाठी पालिका प्रशासनाने दक्षता घेतली आहे. तसेच यंदाच्या वर्षी नालेसफाईबरोबरच नाल्यांना जोडण्यात आलेली व रस्त्यांच्या कडेला असलेली गटारे यांची देखील सफाई करण्यात येणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई योग्य पध्दतीने न झाल्यास ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. यावर जरब बसावी म्हणून नालेसफाईचे ड्रोनद्वारे निरीक्षण करण्यात येणार असून नालेसफाईत हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
नालेसफाईसाठी नऊ प्रभाग समिती अंतर्गत नऊ कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या असून त्यानुसार प्रत्येक ठिकाणी विविध संस्थांना ही कामे वाटून देण्यात येणार आहेत. यासाठी 9 कोटी 96 लाख 97 हजार 942 रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.