शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या हाणामाऱ्या?

शिवसेना ठाकरे गटाचे शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिका शाळा क्रमांक २५(मराठी) इंदिरानगर येथील शाळेत शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे वारंवार विद्यार्थ्यांमध्ये हाणामाऱ्या होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन केले.

नुकत्याच झालेल्या एका हाणामारीत वंश कोकणे या विद्यार्थ्यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली आहे. तर यापूर्वी देखील हिंदी माध्यम शाळा क्रमांक ७१ येथे अपघात होऊन एका विद्यार्थ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे या शाळांत शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे सातत्याने मुलांची हाणामारी आणि अपघात होत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता देखील घसरली आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे सातत्याने या घटना घडत आहेत, त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिक्षण उपायुक्तांकडे करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख प्रविण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख महेश कोटीवाले, उपशहर प्रमुख सिद्धाराम शिलवंत यांनी विद्यार्थी व पालक यांना सोबत घेऊन शिक्षण उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. झालेल्या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन उपायुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सुमित्रा कडू, मनोज इसवे, संदीप पाटील, उपशहर प्रमुख समीर बागवान, माजी नगरसेवक विशाल ससाणे, विभागप्रमुख विशाल विचारे, मिलिंद भोईर, शाखाप्रमुख जयेश कांबळे, महाराजा पिल्लई तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.