मासे नाहीसे झाल्याने मच्छिमारांमध्ये संताप
पालघर: पालघरमधील बोईसर-तारापूर एमआयडीसीतील कंपन्यांमधून निघणारे केमिकलयुक्त रासायनिक घातक सांडपाणी खुलेआम समुद्रात सोडण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बोईसर-तारापूर एमआयडीसीत साडेबाराशे पेक्षाही अधिक लहान मोठे कारखाने आहेत. यामध्ये केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या, फार्मास्युटिकल कंपन्या, गारमेंट कंपन्या तसेच सर्व क्षेत्रातील कंपन्या स्थित आहेत. त्यामुळे येथील कंपन्यांमधून निघणारं रासायनिक सांडपाणी सीईटीपीमार्फत प्रक्रिया करुन पुढे ते बोईसर तारापूरच्या पश्चिमेस असलेल्या नांदगाव समुद्रकिनाऱ्यालगत समुद्रात सोडले जाते. मात्र सध्या या कंपन्यांकडून हे केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जात असल्याचे वारंवार प्रकार उघडकीस येत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे परिसरातील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून समुद्रातील जैवविविधतेवरही याचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
बोईसर-तारापूर एमआयडीसीतील कारखाने राजरोसपणे अशा पद्धतीने आपलं केमिकलयुक्त घातक रासायनिक सांडपाणी खुल्या समुद्रात तसेच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मात्र या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून याचा परिणाम मासेमारीवरही होताना दिसत आहे. या केमिकलयुक्त रासायनिक सांडपाण्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत सापडणारे अनेक मासे सध्या नाहीसे झाले असून मासेमारीवर उपजीविका करणाऱ्या अनेक कुटुंबांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे या सगळ्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बोईसर-तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमधून निघणारे रासायनिक सांडपाणी हे सीईटीपीमार्फत प्रक्रिया करुन नंतरच ते समुद्रात सोडणे बंधनकारक आहे. मात्र या सगळ्या नियमांची पायमल्ली करत कंपन्या राजरोसपणे हे रासायनिक सांडपाणी खुलेआम समुद्रात सोडत आहेत. याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रारी अर्ज आणि आंदोलन करुनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या सगळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर येत आहे.