अंबरनाथ : पेंटोग्राफ तुटल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली. दुरुस्तीच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांचे अर्धा ते पाऊण तास हाल झाले.
कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान आज दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेगाड्या अर्धा ते एक तास विलंबाने धावत होत्या.
सीएसटीएमटीवरून खोपोलीकडे दुपारी एक वाजून सहा मिनिटांनी धावणारी जलद मार्गावरून जाणारी लोकल ठाणे रेल्वे स्थानकातून धीम्या मार्गावरून काढण्यात आली. मुळात २० मिनिटे उशिराने लोकलचे आगमन झाले. जलद लोकल असतानाही धीम्या गाडीच्या वेगाने लोकल धावत होती. खोपोली लोकल अंबरनाथ स्थानकात १ वाजून ३८ मिनिटांनी येण्याची वेळ होती मात्र लोकल दोन वाजून ३६ मिनिटांनी अंबरनाथ स्थानकात आली, लोकलला उशीर झाल्याने प्रवाशांची एकच गर्दी झाली होती.
मागील आठवड्यात दुपारी एकच्या दरम्यान ठाणे-बदलापूर लोकल वेळेत सुटली होती. तरीही ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान लोकल रखडली. कल्याणवरून पुढे रवाना झाल्यानंतर विठ्ठलवाडी यार्डातून कर्जतच्या दिशेने मालगाडीला प्राध्यान्य दिल्याने वेळेवर धावणारी बदलापूर लोकल अर्ध्या तास विलंबाने धावत होती. ऐन उन्हाळाच्या दिवसात लोकल उशिरा धावत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.