कडोंमपाकडून इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित

रहिवाशांमध्ये खळबळ, बिल्डरवर आरोप
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण पश्चिमेतील घोलपनगर येथील शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या 14 इमारती अती धोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
एकीकडे जीर्ण वास्तूंमुळे जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरकडून मानसिक छळ आणि दबाव असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेने कारवाईने रहिवाशांची झोप उडाली आहे. इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसां दरम्यान, रहिवाशांचे म्हणणे आहे की बिल्डर पुनर्विकास प्रक्रियेत धमकी देत आहे. रहिवाशांना संपूर्ण माहिती न देता आणि त्यांच्या संमतीशिवाय घाईघाईने निर्णय घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप होत आहे.
प्रकरणाचे गांभीर्य पाहून भाजपचे नगरसेवक दया गायकवाड, शिवसेनेचे नगरसेवक गणेश कोट यांनी घटनास्थळी भेट दिली. रहिवाशांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर गायकवाड यांनी कडक सूर अवलंबत बिल्डरला ताकीद दिली. पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही रहिवाशाच्या हक्कांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. बिल्डरच्या मनमानी आणि दबावाच्या राजकारण खपवून घेतले जाणार नाही असे सांगितले.
शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. पुर्नविकासाच्या नावाखाली बिल्डरच्या मनमानी, दबावाला झुगारून केडीएमसी आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून रहिवाशांच्या हिताचे रक्षण करू, असे आश्वासन यानिमित्ताने लोकप्रतिनिधींनी दिले आहे.