ठाणे: वाढती वाहनसंख्या, दुहेरी पार्किंग आणि नियोजनाचा अभाव असल्याने वाहतूक कोंडीमुळे नौपाडा, पाचपाखाडी आणि कोपरी भागातील प्रवास कष्टप्रद ठरू लागला आहे. केवळ वाहतूकच नाही तर सामाजिक आरोग्यही या समस्येमुळे धोकादायक होणार असल्याची भीती येथील रहिवासी वरुण पुराणिक यांनी व्यक्त केली आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास उद्या परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा सावधगिरीचा इशारा देत त्यांनी उपाययोजनांची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
मागील काही वर्षांत या परिसरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, रस्ते अरुंद असून दोन्ही बाजूंनी वाहनांची पार्किंग व्यवस्था असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अनेक ठिकाणी वन-वे किंवा सर्क्युलर ट्रॅफिक प्रणाली नसल्याने दररोज कोंडी निर्माण होते. या समस्येमुळे कार्यालयीन वेळेत व शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या काळात वाहतुक कोंडी होते. या गोंधळाचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना बसत असून, रस्ता ओलांडणे देखील धोकादायक ठरत आहे. री-डेव्हलपमेंट प्रकल्पांमुळे या भागातील लोकसंख्या आणि वाहनसंख्या दोन्ही झपाट्याने वाढत असल्याने, पुढील काही वर्षांत वाहतूक कोंडी आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे आताच नियोजनबद्ध पावले उचलणे आवश्यक आहे, असे पुराणिक यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर पुराणिक यांनी काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यात, “तज्ञ वाहतूक सल्लागारांकडून संपूर्ण क्षेत्राचा सखोल अभ्यास करून उपाय निश्चित करावेत. स्थानिक सोसायट्या व नागरिकांचा सहभाग घेऊन ठोस नियोजन तयार करावे. दुहेरी पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कारवाई करावी. लहान रस्त्यांवर वन-वे किंवा सर्क्युलर ट्रॅफिक प्रणाली लागू करावी. शाळांच्या परिसरात ‘ट्रॅफिक डिसिप्लिन झोन’ची काटेकोर अंमलबजावणी करावी. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये तसेच पादचाऱ्यांमध्ये वारंवार वाद होतात, त्यामुळे सामाजिक वातावरणावरही नकारात्मक परिणाम होत आहे. ही समस्या केवळ वाहतुकीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे, असे पुराणिक यांनी नमूद केले आहे.