अंबरनाथमध्ये भाजपला धक्का; पाच उमेदवारांचे अर्ज बाद!

ठाणे: अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. छाननी प्रक्रियेत पाच उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने भाजपला आता ५९पैकी ५४ जागांवरच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका  प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. अंबरनाथमध्ये खरी लढत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. शेवटच्या क्षणाला युती फिस्कटल्याने शिंदे यांची शिवसेना आणि भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे. 1995 पासून अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र येथे सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या भाजपला निवडणुकीआधीच मोठा धक्का बसला असून त्यांच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले असल्याचे कळते.

अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये 59 जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे. आता पाच जागांवरील उमेदावरांचे अर्ज बाद झाल्याने भाजपला 54 जागांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मिळालेल्या ⁠या झटक्यामुळे भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अंबरनाथ निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली असून उद्या उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवट दिवस असल्याने उमेदवार पळवा पळविला आता सुरुवात होईल, अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.  भाजप आणि शिवसेनेची 30 वर्षाची युती या निवडणुकीत तुटली आहे.   दोन्ही पक्ष अंबरनाथ नगरपालिका स्वबळावर लढत असल्याने येथील लढत चुरशीची होणार असून याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतही फूट पडली आहे. नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदाकरिता आपले उमेदवार उभे केले असून उमेदवारी अर्ज भरलेही आहेत.