कल्याण : केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मदतीने कडोंमपाने बीएसयुपी अंतर्गत सात मजल्यांच्या अनेक इमारती उभ्या केलेल्या आहेत. मात्र झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाअभावी या इमारती धूळखात पडल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १२ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतींकडे कायम दुर्लक्ष झाल्याने भुरट्या चोरट्यांनी येथे लिफ्टपासून दरवाजे, खिडक्या, जलवाहिन्या आणि वीजेच्या वायरी देखील चोरीस गेल्या आहेत. एकीकडे प्रतिक्षा यादीत असणाऱ्यांना पालिकेने अद्याप घरांचा ताबा दिलेला नसून दुसरीकडे उपलब्ध इमारती पडून आहेत.
कल्याण पश्चिम येथील शंकरराव चौक, महात्मा गांधी चौक, दूध नाका, पार नाका आणि लोकमान्य टिळक चौक या ठिकाणी पालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत सिंह यांच्याकडे कार्यभार असताना सर्व समावेशक धोरण टप्पा क्रमांक एक अंतर्गत रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबविण्यात आली होती. 154 नागरिकांचे घरे दुकाने व मोकळी जागा या रुंदीकरणात बाधित झाली होती. मात्र 23 वर्षानंतरही या बाधितांचे पुनर्वसन व भरपाई पालिका प्रशासनाकडून अद्यापही मिळून आलेली नाही.
हायकोर्टाने 154 नागरिकांचे पुनर्वसना संदर्भात पालिका प्रशासनाला आदेश देऊनही अद्यापही त्यांचे पुनर्वसन करण्यात पालिकेने धोरणच राबविले नाही. जुलै महिन्यात जागृत नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर यांनी यासंदर्भात वेळोवेळी पत्र व्यवहार करीत आंदोलन पुकारले असता पुनर्वसन समितीचे अध्यक्ष असलेले सिटी इंजिनियर अर्जुन अहिरे यांनी आंदोलकांना लेखी पत्र देत आठवड्याभरात पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले होते. मात्र या पत्राला चार महिने उलटूनही पालिका प्रशासनाने याकडे नजर अंदाज केल्याचे दिसून येत आहे.