प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा
ठाणे: बदलापूरला येणाऱ्या मेट्रो १४चे काम मी मुख्यमंत्री असेपर्यंत केले. मात्र त्यानंतर स्थगिती सरकारने नंतर ते काम अडकवले. आता या मेट्रो मार्गाची निविदा निघाली आहे. पूर्वीप्रमाणे आता मेट्रो प्रकल्पासाठी अनेक वर्ष लागणार नाही. मेट्रो प्रकल्प तीन ते चार वर्षात पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मेट्रो पाच ही बदलापूरपर्यंत कशी येईल यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी फडणवीसांनी दिले. बदलापुरात नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी फडणवीस गुरूवारी बदलापुरात आले होते. शिंदेंच्या शिवसेनेविरूद्ध येथे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस युती निवडणूक लढते आहे. फडणवीसांनी येथे शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले.
कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी बदलापुरात जाहीर सभा घेतली. राज्यात युतीत असलेले पक्ष बदलापुरात एकमेकांविरूद्ध लढत आहेत. फडणवीस येण्यापूर्वीपर्यंत शिंदेंची शिवसेना विरूद्ध भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने एकमेकांवर अनेकदा जोरदार टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. मात्र फडणवीसांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करणे टाळले. भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी, मी कुणावर टीका टिपणी करण्यासाठी, उणीदुणी काढण्यासाठी आलो नाही, असे स्पष्ट केले. शहर विकासाची ब्लु प्रिंट घेऊन आलो आहे. ज्यांच्याकडे बोलायला नसते, ज्यांना विकास काय माहिती नाही ते उणीदुणी काढतात, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे शहर विकासासाठी बदलापुरात भाजपच्या रूचिता घोरपडे यांना विजयी करा, असे आवाहन यावेळी फडणवीस यांनी केले.
कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रो १४ चे काम मी मुख्यमंत्री असेपर्यंत केले, त्यानंतर स्थगिती सरकारने ते काम अडकवले, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मात्र या मेट्रोची १८ हजार कोटींची निविदा जाहीर झाली असून लवकरच ते पूर्ण होईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. सर्वच मेट्रोचे काम आता तीन ते चार वर्षात पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे, असेही यावेळी फडणवीस म्हणाले. सर्वसामान्यांची लोकल रेल्वे सुरक्षित करायची आहे. मेट्रोसारखे रेल्वेचे डब्बे होणार तेही कोणतीही भाडेवाढ न करता, असेही यावेळी फडणवीसांनी जाहीर केले.
शहरातील पूर रेषेची नव्याने आखणी करणार, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, भाजपचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.