ऐन पावसाळ्यात अशोका धबधबा बंद

पर्यंटनप्रेमींचा होतोय हिरमोड

कसारा: येथून जवळच असलेल्या विहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील एक निसर्गरम्य व प्रेक्षणीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेला अशोका धबधबा परिसर गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने पावसाळ्यात इथे येणा-या पर्यटकांचा मात्र हिरमोड होत आहे. येथील छोट्या दुकानदारांना सुद्धा उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह होणे दुरापास्त झाले आहे.

ब-याच ठिकाणी पोहण्याचा आनंद लुटण्याच्या नादात काही अतिउत्साही तरुण पाण्याचा ठाव न लागल्याने वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना पावसाळ्यात घडत असतात. पर्यायाने या अप्रिय घटना घडू नये म्हणून आणि खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हाधिका-यांनी हा निर्णय घेतला आहे.

अशोका धबधबा परिसरास पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून त्यावर शासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत. यामुळे डोंगराच्या कुशीत दडलेल्या अशोकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. येथे सिने अभिनेते शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या अशोका चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. तेव्हापासून या धबधब्यास ‘अशोका’ हे नाव देण्यात आले. सध्या हौशी पर्यटक येथील प्रवेशद्वाराला लागलेले कुलूप पाहून त्यांचा भ्रमनिरास होतो. वनविभाग कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता माहे सप्टेंबरमध्ये हा परिसर खुला केला जाईल, असे सांगण्यात येते.