आडीवलीत रस्ते नसल्याने महिलांनी घातले अधिकाऱ्यांचे श्रद्धा

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. महापालिका मुख्यालयाच्या बाहेर महिला आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महापालिका अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक श्राद्ध घालून जाहीर निषेध आंदोलन केले.

आडिवली परिसरातील रस्ते गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहेत. नागरिक वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने कुठलीही दखल घेत नसल्याने गेल्या अडीच वर्षांपासून पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू केला. यानंतर पालिकेने लेखी स्वरूपात पाच महिन्यांत रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. यामुळे संतापलेल्या महिला आणि नागरिकांनी आम्ही टॅक्स भरतो, मग आमचा टॅक्स जातो कुठे? असा संतप्त सवाल उपस्थित करत. दंड वसूल करायला येता, पण पाणी, रस्ता आणि सुविधा मात्र देत नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.

इतकेच नाहीतर पालिकेकडून दिले जाणारे उडवा उडवीचे उत्तरामुळे संतप्त झालेल्या या महिलांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी अनोखे ‘श्राद्ध आंदोलन’ केले.

यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, काव काव, आडिवलीचा रस्ता खाव खाव अशा घोषणांनी पालिका मुख्यालय परिसर दणाणून सोडले. या खराब रस्त्यांमुळे लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्धांना मोठा त्रास होत आहे. रस्त्यावर अनेकवेळा अपघातही झाले आहेत. महानगरपालिकेने यापुढे लक्ष दिले नाही तर आम्ही रस्ता रोको करू, असा इशारा या महिला आणि नागरिकांनी पालिकेला दिला असल्याची माहिती सोनी क्षिरसागर यांनी दिली.