न्यायालयाच्या आदेशाने जागा ताब्यात घेण्यास सुरूवात
अंबरनाथ: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंबरनाथ येथील शेतकी सोसायटीच्या जागेवरील अतिक्रमणावरील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
शासनाने शेतकी सामुदायिक सोसायटीला शेतीसाठी दिलेल्या जागेवर नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने शेतकी सोसायटीची जागा शासन जमा करण्याचे आदेश जानेवारी महिन्यात दिले होते. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हे नंबर १६६/५ येथील आठ हेक्टर जागेवरील अतिक्रमणे हटवण्सास बुधवार २५ फेब्रुवारी रोजी प्रशासनाने सुरूवात केली. स्थानिक पोलीस आणि पालिकेचे एमएसएफ सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थित राजकीय दबाव झुगारून अंबरनाथ तहसीलदार कार्यालय आणि अंबरनाथ नगर परिषदेचे अतिक्रमण विरोधी पथक यांनी केलेल्या संयुक्त कारवाई केली. यावेळी जेसीबीच्या साह्याने सहा अनधिकृत बांधकामे, एक सुरक्षा कंपाउंड आणि एक बेकायदेशीर जीन्स धुलाई कारखाना या कारवाईत उध्वस्त करण्यात आला.
कारवाई दरम्यान सोसायटीच्या जागेवर जीन्स धुलाई कारखाना बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय त्याचे प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी थेट वालधुनी नदीच्या उपनदीत सोडले जात असल्याचेही समोर आले. कारखान्यातून प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी थेट वालधुनीला जाऊन मिळणाऱ्या प्रवाहात मिसळत असल्याने परिसरात पाणी साचले होते. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात हा कारखाना सुरू होता. मात्र कोणत्याही प्रशासनाला दिसला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने येथील शेतकी सोसायटीचे अपील फेटाळून लावत राज्य सरकारचा जमीन पुनर्ग्रहणाचा निर्णय योग्य ठरवला होता. याच जमिनीचा बहुतांश भाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारण्यासाठी वापरली जाणार आहे. शेतीसाठी दिलेल्या सरकारी जमिनीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे यावेळी दिसून आले. जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर घरे व चाळी, दुकाने व शेड, फार्महाऊस अशी शेकडो अतिक्रमणे होती. ही जागा तीन महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेश स्थानिक तहसिलदारांना न्यायालयाने दिले होते. आठ हेक्टर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय उभारण्याचे प्रस्तावीत आहे. या कारवाईत सहा बांधकामे, एका जागेवरील सुरक्षा भिंत तर एक जीन्स कारखाना जमीनदोस्त करण्यात आला आहे.
अंबरनाथचे तहसिलदार अमित पुरी, अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दीपक अनारे अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र संख्ये यांच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली.