मुंबई : सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडले. आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्याचा निर्णय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतला आहे. त्यामुळे आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी आज सकाळी (दि. 14) अहमदाबाद येथून तेजस एक्सप्रेसने मुंबईत दाखल झाले. यावेळी आचार्य देवव्रत पत्नी दर्शना देवी यादेखील उपस्थित होत्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे स्वागत केले आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्यावतीने आचार्य देवव्रत यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तर, राजभवनात मुंबई पोलिसांच्यावतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. सोमवारी सकाळी 11 वाजता राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते अतिरिक्त कार्यभार स्वीकारतील.
आचार्य देवव्रत हे जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यापूर्वी ते ऑगस्ट 2015 ते जुलै 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. आचार्य देवव्रत हे हरियाणातील गुरुकुल कुरुक्षेत्रमध्ये प्राचार्य होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले असून सामाजिक क्षेत्रात देखील ते कार्यरत होते.