निवडणूक आयोग बरखास्त करा

उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबई: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या निर्णयावर आक्षेप घेण्यात येत आहे. आता निवडणूक आयोगच बरखास्त करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

“पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो निर्णय अयोग्य आहे. आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे, असा निवडणूक आयोग बरखास्त करावा. कोर्टात यांची मनमानी चालणार असे होणार नाही. सध्या गुंतागुंत वाढावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित करत सध्याचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. गुंता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय दिला का? काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत असाच वाद झाला होता. बाकी कुणालाही अशा प्रकारे निर्णय देण्यात आलेला नाही. मधल्या काळात बातम्या आल्या की बोगस शपथपत्रे आम्ही दिली आहेत. मात्र याची चौकशी झाली आणि असे काहीच नसल्याचे समोर आले. आम्ही लाखोंनी कागदपत्रे दिली, मात्र त्याचे पुढे काय झाले? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशा असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न

सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या शिवसेनेसाठी सर्वात कठीण प्रसंग आहे. शिवसेनाप्रमुख गेले तेव्हा जसा प्रसंग होता, तसा प्रसंग आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेना टिकणार नाही असे बोलले जात होते. पण आपण जिंकलो. सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्यचा प्रयत्न केला आहे. भाजपच तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. आता जर जागे नाही झालो तर 2024 मध्ये हुकुमशाही येईल. मिंधे गटाला नाव आणि चिन्हं दिले. कालांतराने त्यांच्यावरील जुन्या केसेस उघडणार आणि शिवसेना संपवायचा डाव आहे. 28 तारखेपर्यंत मशाल हे चिन्ह वापरू शकतो हे चिन्ह जरी काढून घेतले तर अजून दहा चिन्हे माझ्या मनात आहेत.