ठाणे: शहापूर तालुक्यात माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या रांजण खळगे धबधब्यावर साडेबाराच्या सुमारास आंघोळीचा आनंद घेत असताना 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सॅम राज दुराई असं या मृत तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील कुर्ला परिसरात राहत होता. तो आपल्या पाच मित्रांसह माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. यावेळी ही घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ टीम आणि जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रशासनाने या धबधबा परिसरात पर्यटनासाठी बंदी घातलेली असूनही पर्यटकांचा वावर सातत्याने सुरू आहे. या ठिकाणी यापूर्वीही जवळपास 60 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. तरीदेखील नागरिक जीवनाच्या धोक्याची पर्वा न करता येथे गर्दी करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना अशा ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.