वन विभागविरोधात संतापाची लाट
शहापूर: डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीतील कळभोंडे लाद्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात १० वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लाद्याची वाडी येथील कृष्णा आगीवले असे बालकाचे नाव असून मंगळवारी सकाळी सुमारे ९ ते १०च्या दरम्यान गावाशेजारीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी या प्रकरणामुळे वनमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांना वनअधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कृष्णा आगीवले हा मुलगा सकाळच्या सुमारास घराजवळील परिसरात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली.
या घटनेनंतर वन विभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली होती. मात्र कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने अखेर एका निष्पाप बालकाचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांकडे स्थानिक वनअधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तत्काळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, परिसरात गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे आगीवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्या भागात बिबट्यांचे दर्शन होत आहे किंवा हल्ले झाले आहेत, त्या भागात वन विभागाने गस्त (पेट्रोलिंग) वाढवावी व सतत लक्ष ठेवावे, अशा सूचना वनमंत्र्यांनी केल्या होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व तंत्रज्ञानाचा वापर करुन बिबट्यांची हालचाल ओळखण्यासाठी कॅमेरे, सेन्सर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने निगराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणुन बिबट्यांना जंगलात किंवा सुरक्षित भागात अन्न उपलब्ध करून देणे. यामध्ये कोंबड्या व शेळ्या अशा उपाययोजनांचा विचार करण्यास सांगितले होते तसेच गरज पडल्यास नियंत्रणात्मक उपाय म्हणुन बिबट्यांची संख्या जास्त असल्यास त्यांची नसबंदी हा शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याचा विचार करण्याचेही निर्देश दिले होते. दरम्यान नागरिकांची सुरक्षा तसेच मदतीसाठी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत देणे आणि लोकांना सावध राहण्याचे आवाहन करणे आदी सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाला दिल्या होत्या मात्र शहापूर उपवनसंरक्षक कार्यालयाकडून या सुचनांचे पालन होत नसल्याचा आरोप श्रमजीवीचे प्रकाश खोडका यांनी केला आहे.