वन्य प्राण्याच्या झडपेत ७५० कोंबड्यांचा फडशा

शहापूर : ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील एका गावात कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याच्या साडेसातशे पक्ष्यांवर एकाच वेळी वन्य प्राण्याने हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.

शहापूर तालुक्यातील साने नावाचे गाव आहे. या गावात सागर पाटील हे आपल्या कुटूंबासह गेले अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. पूर्वी शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. परंतु, अवकाळी पावसाने अनेकदा शेतीचे नुकसान होऊन आर्थिक फटका सहन करावा लागत होता. यासाठी सागर यांनी शेतीसह कुक्कुटपालनाचा जोड व्यवसाय सुरु केला. गेले तीन वर्षांपासून ते कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहेत. सध्या त्यांच्या पोल्ट्रीमध्ये १३०० कोंबड्या होत्या. या कोंबड्या विक्रीसाठी तयार झाल्या होत्या.
पुढील काही दिवसातच चांगल्या किंमतीत या कोंबड्यांची विक्री होणार होती. परंतु, या कोंबड्यांची विक्री होण्याआधीच या पोल्ट्रीमधील ७५० कोंबड्या सोमवारी रात्री मृतावस्थेत आढळून आल्या. या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ पसरली आहे. हा हल्ला नेमका कोणी आणि कसा केला याची अद्याप स्पष्टता झालेली नाही.

या पोल्ट्री फार्मच्या लगत जंगल परिसर आहे. या जंगलात अनेक वन्य प्राण्यांचा वावर असून त्या वन्य प्राण्यांपैकीच कोणत्या तरी एका प्राण्याने या पक्ष्यांवर हल्ला केल्याची शक्यता गावातील नागरिकांकडून वर्तवली जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी सागर पाटील हे धास्तावले आहेत. पुढच्या काही दिवसातच पक्ष्यांची विक्री होणार होती. त्यातून चांगली किंमत मिळणार होती. मात्र, पोल्ट्री लगत असलेल्या जंगल परिसरातील वन्य प्राण्याने पोल्ट्रीमधील पक्ष्यांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला. यामध्ये किमान दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सागर पाटील यांनी सांगितले असून या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.