कुत्रा चावल्याने मानसिक संतुलन बिघडले; युवकाची आत्महत्या

कल्याण: कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका परिसरात कुत्रा चावल्यानंतर रेबिजची लक्षणे दिसू लागल्याच्या भीतीने ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी, बी विंगमधील फ्लॅट क्रमांक ९०३ मध्ये राहणारा आयश अमीन (३०) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या पश्चात एक भाऊ आणि वृध्द आई-वडील असा परिवार आहे. तो गेली आठ वर्षांहून अधिक काळ भारत बँक, ठाणे शाखेत नोकरी करत होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिसगांव नाका परिसरात भटक्या कुत्र्याने अमीन यांच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जाते. मागील चार दिवसांपासून त्यांच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. दरम्यान, काल सायंकाळी घरात कोणीही नसताना अमीन यांनी आपण आत्महत्या का करीत आहोत याबाबतची सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस ठाणे करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले.