लेखाजोखा ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पळापळ
ठाणे: साडेतीन वर्षांहून अधिक काळ निवडणुकांभावी ठाणे महापालिकेची महासभा अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय राजवटीचा फायदा घेत, नको त्या प्रकल्पावर करोडोंचा खर्च आणि मनमानी कारभार करण्यात आला. आता काही दिवसांतच निवडणूक आटोपून नगरसेवक महासभेत स्थानापन्न होणार आहेत. त्यावेळी कारभाराचे पितळ उघडे पडू नये म्हणून केलेल्या कामांचा लेखाजोखा ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पळापळ सुरु झाली आहे.
ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपून चार वर्षे उलटली. सुरुवातीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे काही कामे सुरळीत चालली होती. मात्र, प्रशासकीय राजवटीत कामकाजाकडे दुर्लक्ष झाले. त्याचा थेट फटका शहरातील नागरिकांना बसू लागला. अनेक मूलभूत सुविधांची वानवा निर्माण झाली. सर्व अधिकारी आयुक्तांकडे असल्यामुळे महासभा झाल्या नाहीत. प्रशासकीय सभा आयुक्तांच्या दालनात व्हायच्या. तसेच वित्तीय मान्यता, परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांना होता.
आता निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून अवघ्या एका आठवड्यावर मतदानाची तारीख आली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर पालिकेचा कारभार लोकप्रतिनिधीच्या हाती येणार असल्याने प्रत्येक कामांचा, फायलींचा हिशेब होणार आहे.
दरम्यान आर्थिक संकटात सापडलेली ठाणे महापालिकेची तिजोरी आधीच रसातळाला गेलेली आहे. सध्याच्या घडीला प्रशासनाकडे अवघे काही कोटी शिल्लक आहेत. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना विकासकामांच्या निधीसाठी धावाधाव करावी लागणार आहे. त्यामुळे विकासकामांच्या निधीसाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.