ठाणे : कळवा परिसरातील सहकार विद्यालयात विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणात शाळा प्रशासन आणि पोषण आहार पुरवणाऱ्या पुरवठादारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकांच्या तक्रारी नंतर कळवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये तक्रारीमध्ये मात्र कोणाची नावे टाकण्यात आलेली नाहीत, अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली आहे.
कळवा सह्याद्री परिसरातील सहकार विद्या प्रसारक मंडळ या खासगी अनुदानित शाळेत मंगळवारी मटकीची आमटी आणि भात खाऊन ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजूनही या सर्व विद्यार्थ्यांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोषण आहार मुलांना देण्यापूर्वी शिक्षकांनी तो आहार खाऊन परीक्षण करायचे असते. मात्र तसे करण्यात आले नाही. मटकीचा वास येत होता तर ती मुलांना का देण्यात आली ? असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत. या सर्व प्रकारात शाळा प्रशासनाचा तसेच पुरवठादाराचा हलगर्जीपणा समोर आला असल्याने याविरोधात अखेर पालकांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे पाहणी दौऱ्यासाठी येणार असल्याने रुग्णालयातील विषबाधाग्रस्त विद्यार्थ्यांना रात्री दोन वाजता जागे करण्यात आले. ते थातूरमातूर पाहणी करून निघून गेल्याने शिक्षणमंत्री केसरकरांचा हा कुठला दौरा असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला.
ठाण्यातील अनुदानित शाळांना शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी शासनाने आशीर्वाद महिला मंडळ या संस्थेला ठेका दिला आहे. सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेलाही याच संस्थेकडून पोषण आहार दिला जातो. दरम्यान विषबाधा घटनेनंतर ज्या ठिकाणी अन्न बनवले जाते त्याठिकाणी जाऊन अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पाहणी केली. यामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने एफडीआयने दुकानाला सील ठोकले आहे.
रात्री उशिरापर्यंत ४५ विद्यार्थी दाखल
मंगळवार रात्री उशिरापर्यंत एकूण ४५ विद्यार्थ्यांना कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ३७ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना २४ तास निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना संध्याकाळी पाच वाजता सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे .तर उर्वरित आठ विद्यार्थ्यांमध्ये ताप व उलट्या ही लक्षणे दिसत आहेत. त्यांना अजून बारा तास निगराणीखली ठेवावे लागणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.