अंबरनाथ : उल्हासनगरमधून हद्दपार झाल्यानंतर अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांच्या ग्रामीण भागात बस्तान बसवून जलप्रदूषण करणाऱ्या जीन्स धुलाई कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेर कारवाई सुरू केली आहे.
वालधुनीसह परिसरातील इतर नैसर्गिक प्रवाहांच्या प्रदूषणाला थेट कारणीभूत ठरणाऱ्या पाले गावातील १६ आणि मलंगगड परिसरातील कुंभार्ली येथील ३ अशा एकूण १९ अनधिकृत कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी थेट ‘काम बंद’ करण्याची नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत.
या परिसरातून वालधुनी नदी वाहते. मात्र, राजरोसपणे सुरू असलेल्या या जीन्स धुलाई कारखान्यांमधून निघणाऱ्या घातक आणि रासायनिक सांडपाण्यामुळे वालधुनी नदीची अक्षरशः गटार अवस्था झाली आहे. या कारखान्यांमधील दूषित पाणी कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता नदीचा मुख्य प्रवाह आणि नदीला येऊन मिळणाऱ्या अनेक नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये थेट सोडले जात आहे. काही ठिकाणी थेट खड्डे खोदून हे विषारी पाणी जमिनीतही मुरवले जाते. हे सांडपाणी वालधुनी, उल्हास आणि काळू नदीच्या प्रवाहात मिसळते. उल्हास नदीतून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पिण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने, हा थेट लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील काराव ग्रामपंचायत हद्दीतही असे उद्योग सुरू असून येथील पाणीही थेट उल्हास नदीत मिसळते.
एमपीसीबीने १९ कारखान्यांना नोटिसा दिल्या असल्या तरी, ही कारवाई केवळ कागदावरच न राहता या परिसरातील अनधिकृत कारखान्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त प्रशासनाने करावा, अशी मागणी होत आहे.