गटारीच्या मेजवानीसाठी माशांचा भाव वाढला

नवी मुंबई: गटारी अमावास्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उरण परिसरातील मासळी बाजारांमध्ये खवय्यांची मोठी गर्दी होत आहे. यंदा गटारी बुधवारी (ता. १२) येत असून त्याआधीचा रविवार एकादशी असल्याने अनेक खवय्यांनी मांसाहारी मेजवानीचा बेत शुक्रवार आणि बुधवारीच आखला असल्याने मासे, चिकन आणि मटण खरेदीला चांगलाच जोर आल्याचे दिसत आहे.

सागरी किनारपट्टीवरील समुद्रातील मासेमारी बंदीचा कालावधी यंदा १५ ऑगस्टपर्यंत असल्याने मुंबईसह नवी मुंबईच्या कोळीवाड्यांमध्ये स्थानिक ताज्या माशांचा पुरवठा मर्यादित आहे. परिणामी गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच इतर राज्यांतून येणाऱ्या माशांवरच ग्राहकांना अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे कमी पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे सुरमई, पापलेट, रावस, बांगडा, कोळंबी आदी माशांच्या दरात सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही वाढलेल्या किमतीची पर्वा न करता खवय्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.

भाऊचा धक्का, ससून डॉक, कुलाबा, उरण, अलिबाग परिसरातील मासळी बाजारांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होत असून अनेक ठिकाणी आवडत्या माशांसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, गटारीच्या आदल्या दिवशी मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून बाजारपेठा पूर्ण क्षमतेने गजबजणार असल्याचे अनिता कोळी यांनी सांगितले.

सध्याचे दर

सुरमई – २५००/- किलो
पापलेट – १५००/- किलो
कोळंबी – ६००/-
हलवा – ११००/-
जिताडा – १८००/-
बोंबील वाटा ५०० ( १२ नग )