ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या सातत्यपूर्ण उपचारांनी घडवला चमत्कार
ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने तब्बल २२ वर्षांपासून कुटुंबापासून दूर असलेल्या मनोरुग्णाला केवळ मानसिकदृष्ट्या सावरले नाही, तर त्याला पुन्हा आपल्या उत्तरप्रदेशातील माणसांपर्यंत पोहोचवत मानवतेचा हृदयस्पर्शी आदर्श घालून दिला.
१८ ऑगस्ट २०१७ रोजी राबोडी परिसरात मध्यमवयीन व्यक्ती एकटाच रडत बसलेला आढळला. तो कोणाशीही बोलत नव्हता, अन्नही घेत नव्हता. राबोडी पोलीस ठाण्याचे रमेश अंभोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सुरुवातीची सहा वर्षे रुग्णाने एकही शब्द उच्चारला नाही. मात्र रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी सातत्याने उपचार, समुपदेशन आणि काळजी सुरू ठेवली. उपचारांचा सकारात्मक परिणाम दिसू लागल्यानंतर रुग्णाने स्वतःचे नाव विजय (नाव बदलून) असल्याचे सांगितले. मात्र त्याला स्वतःच्या गावाची किंवा कुटुंबाची माहिती आठवत नव्हती.
रुग्णालयातील मानसोपचार परिचारिका मानसी ओझाळे यांनी मोठ्या कौशल्याने त्याला वही-पेन देऊन अनेक वेळा माहिती लिहून घेतली. या प्रयत्नांतून तो उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील असल्याचे समोर आले असल्याची माहिती रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी दिली.
त्यानंतर समाजसेवा विभागाने गौरी बाजार पोलीस ठाण्याशी संपर्क साधून रुग्णाचा फोटो व आवश्यक माहिती पाठवली. गावच्या सरपंचांमार्फत नातेवाईकांशी संपर्क झाला. त्यावेळी समोर आले की, विजय तब्बल २२ वर्षांपासून बेपत्ता होता. तो जिवंत असल्याचे ऐकून कुटुंबीयांना आनंदाचा धक्काच बसला.
यानंतर अनेक व्हिडिओ कॉलद्वारे रुग्ण आणि कुटुंबीयांचा संवाद घडवून आणण्यात आला. अखेर नातेवाईक ठाण्यात येऊन विजयला घरी घेऊन गेले. गावात त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, मिरवणूक काढण्यात आली आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप दिवेकर, डॉ. फैजान खान, डॉ.सुनिल भडांगे, पुरुष परिचर विष्णू भोईर व प्रल्हाद वाघमारे आदींनी अथक परिश्रम घेतले.
योग्य उपचार, संयम आणि माणुसकीची साथ मिळाली तर मनोरुग्णही पुन्हा आपल्या कुटुंबात आनंदाने परतू शकतो. रुग्णाच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच आमच्या सेवेचे खरे समाधान आहे, अशा भावना डॉ. नेताजी मुळीक यांनी व्यक्त केल्या.