भाईंदर: महाराष्ट्र शासनाने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची केल्याच्या पार्श्वभूमीवर, मीरारोड आणि संपूर्ण राज्यात परिवहन विभागाने १ मे ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान विशेष पडताळणी मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत चालकांना मराठी शिकण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि ४८ तासांत मराठी शिकण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माहितीनुसार, १ मे पासून राज्यातील सर्व ५९ आरटीओअंतर्गत विशेष तपासणी सुरू करण्यात आली. अतिरिक्त परिवहन आयुक्त रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन समितीने मीरा-भाईंदर परिसरात मोठी मोहीम राबवली आहे.
आतापर्यंत केलेल्या तपासणीत सुमारे ३,४४३ रिक्षांची पडताळणी झाली असून, त्यापैकी ५६५ चालकांना मराठीचे मूलभूत ज्ञान नसल्याचे समोर आले आहे. अमराठी आणि परप्रांतीय रिक्षा/टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली. राज्य शासनाने चालकांसाठी अवघ्या ४८ तासांमध्ये प्राथमिक मराठी बोलणे व वाचणे शिकता येईल अशी प्रशिक्षण प्रणाली आणि अभ्यासक्रम तयार केला आहे.
मीरा-भाईंदर आरटीओ क्षेत्रात या उपक्रमासाठी शासनाने ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ यांच्यासोबत भागीदारी केली आहे. चालकांना हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल, जे त्यांचे परमिट नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक असेल.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की, केवळ मराठी येत नाही म्हणून लगेच परवाना रद्द केला जाणार नाही, तर चालकांना १५ ऑगस्टपर्यंत शिकण्याची पूर्ण संधी दिली जाईल. मात्र, मुदतीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.