वाहने धुण्यावर १० जूनपर्यत निर्बंध
ठाणे : शहरातील वाढत्या उष्णतेमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणे व इतर साफसफाईच्या कामांवर 10 जून 2026 पर्यंत निर्बंध घालण्यात आले असून नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
सध्या तीव्र उन्हामुळे धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच शहरातील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळीही खालावली आहे. या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.
पाणी बचतीसाठी प्रभावी उपाययोजना म्हणून सर्व्हिस सेंटरमध्ये दोन, तीन व चार चाकी वाहनांसह इतर वाहनांचे धुणे आणि साफसफाई तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहे.
याशिवाय, सर्व व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. घरगुती पातळीवरही पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात. गाड्या धुणे, अंगण धुणे, नळ सुरू ठेवणे अशा पाणी वाया जाणाऱ्या सवयी टाळाव्यात, असेही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले आहे.