प्रशासनाचा ‘पंचनामा’ आणि २७३ तक्रारींचा पाऊस!
भाईंदर: जनतेचा थेट संवाद आणि प्रश्नांचा जागच्या जागी निपटारा करण्यासाठी गुरुवारी मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने भव्य लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले. केवळ आश्वासनं नाही, तर थेट कृतीचा अनुभव लोकदरबारात उपस्थित मीरा-भाईंदरकरांनी घेतला.
लोकदरबारात महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन, परिवहन आणि वाहतूक विभागाचे अधिकारी एकाच व्यासपीठावर हजर होते. सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकणे आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या तावडीतून सोडवून तत्काळ मार्गी लावणे, हा या उपक्रमाचा मुख्य गाभा होता. जनतेच्या प्रश्नांसाठी बोलावलेल्या लोक दरबारात काही अधिकाऱ्यांनी दांडी मारणे मंत्री सरनाईक यांना मुळीच रुचले नाही. अशा दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांची त्यांनी जाहीर कानउघाडणी करत, “जनतेची कामे टाळणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा दिला. लोकदरबारातील मंत्री सरनाईक यांचा हा रुद्रावतार पाहून उपस्थित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
या पहिल्याच लोकदरबारात एकूण २७३ नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. यात सर्वाधिक तक्रारी महापालिकेच्या कारभाराशी संबंधित होत्या. मंत्री सरनाईक यांनी कोणताही विलंब न लावता, उपस्थित असलेल्या आयुक्तांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रश्नांची सरबत्ती करून अनेक प्रकरणांत जागच्या जागी निर्णय घेण्याचे आदेश दिले. या लोकदरबारात केवळ महापालिकेच्या तक्रारींचाच पाऊस पडला नाही, तर ७/११ कंपनीच्या विरोधात नागरिकांनी संतापाची लाट उसळली होती. ७/११ कंपनीकडून सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे त्रस्त झालेल्या शेकडो नागरिकांनी पुराव्यांसह आपल्या कैफियती मांडल्या. या कंपनीच्या मनमानी कारभाराची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी कडक भूमिका घेतली. “जनतेची लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.