भिवंडी: भिवंडी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी झाली असून निकालानंतर एक महिन्याच्या आत सर्व उमेदवारांनी आपापले निवडणूक काळातील हिशेब निवडणूक अधिकारी यांना सादर करणे अपेक्षित आहे. मात्र त्यापैकी २८ उमेदवारांनी अद्याप आपले निवडणूक हिशेब सादर न केल्याने त्यांना निवडणूक खर्च तपासणी पथक प्रमुखांनी नोटीसा बजावल्या आहेत.
भिवंडी महानगरपालिकेच्या १५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २३ प्रभागांमधील ९० वॉर्डांमध्ये एकूण ४३८ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. निवडणूक निकालापर्यंत आणि नंतर त्यापैकी अनेकांनी आपले हिशेब निवडणूक कार्यालयास सादर केले. मात्र निवडणूक निकाल जाहीर होऊन एक महिना उलटून गेल्यानंतर देखील २८ उमेदवारांनी आपापले निवडणूक हिशेब सादर केले नाही. त्यामध्ये काही मान्यवर उमेदवार असून त्यांना ही हार जिव्हारी लागल्याने त्यांच्याकडून हिशेब देण्यास टाळाटाळ होत आहे, अशीं चर्चा शहरात सुरु आहे. काही उमेदवार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत, याची दखल घेत निवडणूक खर्च तपासणी पथकप्रमुखाने २८ जणांना नोटीस पाठविल्या आहेत. त्यामध्ये ११ महिला उमेदवारांचा तर १७ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या लेखा विभागातील सूत्राने दिली.