भाईंदर: मेट्रोने प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न येत्या ३ एप्रिल रोजी साकार होणार आहे. दहिसर-भाईंदर मेट्रो कॉरिडॉर-९ च्या पहिल्या टप्प्याच्या संचालनाचा मुहूर्त पार पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवून याचे उद्घाटन करतील. ही माहिती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.
गेल्या आठवड्यात, शिवसेना (शिंदे) नेते आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी काशीगाव मेट्रो स्टेशनची पाहणी केली होती आणि एप्रिलमध्ये मेट्रो सेवा सुरू होईल असा दावा केला होता. आधी, डिसेंबर २०२५ मध्ये आणि नंतर या वर्षी जानेवारीमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. या मेट्रोची सुरुवात साडेचार किलोमीटरच्या मार्गावर होईल संपूर्ण मार्ग ११.३८ किमी लांबीचा असून त्यावर आठ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात, ४.५ किमी मार्गावर ४ स्थानकांसह मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रो लाईन ९ ही मेट्रो कॉरिडॉर ७ आणि मेट्रो २ए ला जोडलेली आहे. एकदा मेट्रो ९ सुरू झाली की, तिन्ही रेल्वे लाईन्स जोडल्या जातील. यामुळे मीरा-भाईदर ते अंधेरी पूर्व आणि पश्चिम असा मेट्रोने जोडलेला मार्ग उपलब्ध होईल.
मीरा-भाईंदर मेट्रोला २०१७ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. २०२२पर्यंत येथे मेट्रो सेवा सुरू करण्याचे लक्ष्य होते. मेहता म्हणाले की, उद्घाटन काशिगाव मेट्रो स्टेशनवरून होईल. परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, येथून दररोज ५० हजार प्रवासी प्रवास करतील. सध्या, मीरा-भाईंदरचे रहिवासी दहिसर किंवा आनंद नगर स्थानकांमार्गे अंधेरीला प्रवास करतात. आता मीरा-भाईंदरहून अंधेरीला जाणे अधिक सोपे होईल. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची मेट्रो सेवा या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.