ठाणे: शुक्रवारी दुपारी ठाणे शहरात तापमान ३९ अंशांवर गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी उकाडा प्रचंड जाणवत असल्याने ठाणेकरांनी घराबाहेर पडणे टाळले.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाने तब्बल ४० अंश सेल्सियसचा टप्पा गाठला होता. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरत होते. मात्र त्यानंतर राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाचा पारा देखील ३० ते ३२ अंशावर आला. त्यामुळे ठाणेकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मागील चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. याच कालावधीत उन्हाचा पारा ३५ ते ३९ अंशावर गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रात फिरताना उन्हाचे चटके जाणवत होते. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा ठाणेकरांसाठी अधिक तापदायक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.