युद्धामुळे परदेशी फळांच्या किमतीत वाढ कायम

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही जाणवू लागला असून परदेशातून आयात होणाऱ्या फळांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यात देशी सफरचंदाची आवक कमी झाल्याने परदेशी सफरचंदाची मागणी वाढली आहे. विशेषतः सध्या चैत्र नवरात्री सुरु असल्याने सफरचंद, द्राक्ष, कलिंगड, टरबूज,पपई यांसारखी फळे महागल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, युद्धामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जहाज वाहतूक उशिरा होत असून काही मार्गांवर खर्चही वाढला आहे. यामुळे आयात खर्चात वाढ होऊन त्याचा थेट परिणाम फळांच्या दरावर होत आहे. तसेच काही देशांमधून होणारी निर्यात कमी झाल्याने पुरवठ्यात घट झाली आहे.वाशी येथील एपीएमसी बाजारातील फळ विक्रेत्यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांत परदेशी फळांच्या किमतीत २० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांची खरेदी कमी झाली असून स्थानिक फळांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे.

जे पूर्वी सहज उपलब्ध होत होते, त्याचे दर आता प्रति किलो २० ते ४० टक्के प्रमाणात वाढले आहेत. इराण, साऊथ आफ्रिका, न्यूझीलेड व इटली या देशातून येणाऱ्या सफरचंदाला मागणी वाढल्याने दर देखील अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहक या फळांपासून दूर राहू लागले आहेत. व्यापारी वर्गाच्या मते, युद्ध परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास आगामी काळात फळांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक फळांना अधिक मागणी येऊन देशांतर्गत उत्पादकांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.

* दक्षिण आफ्रिका: पूर्वी १८ किलो सफरचंदाच्या बॉक्स साठी ३२००रु मोजावे लागत होते आता ४२०० रु मोजावे लागतात.
* न्यूझीलँड १८ किलो बॉक्स आधी ५ हजार रुपये तर आता सहा हजार
* इटली १८ किलो बॉक्स आधी तीन हजार तर आता ३८०० रुपये