मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी

ठाणे : राज्यातील आगरी कोळी बांधवांची कुलदेवता असलेल्या लोणावळा येथील एकविरा देवीची यात्रा मंगळवार, बुधवार व गुरुवार अशी तीन दिवस संपन्न होणार आहे. या यात्रेनिमित्त मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर तीन दिवस टोल माफी करण्यात आली आहे. या टोल माफिसाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचे टोल माफीचे पत्र आवश्यक असणार असून हे पत्र टोल नाक्यांवर दाखविल्यास एकविरा भक्तांसाठी टोल माफ होणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

एक्सप्रेस वे टोल प्रशासनाने आपली टोल माफीची विनंती ऐकली असून तीन दिवस ही टोल माफी सुरू राहणार आहे. एकविरा देवीच्या भक्तांनी वाहतूक नियमांचे व सुरक्षिततेचे पालन करून यात्रेस यावे अशी विनंती देखील खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी एकविरा देवी भक्तांना केली आहे.

लोणावळा येथे आगरी-कोळी समाजासह विविध जाती-धर्माचे लोक एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. यावर्षी देखील भाविकांची गर्दी यात्रोत्सवात पाहायला मिळणार आहे. यंदा देवीची यात्रा 24 एप्रिलपासून मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवशी संपन्न होणार आहे. यात्रे निमित्ताने ठाणे, मुंबई- मुंबई उपनगर, रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाज वाहनाने मुंबई-पुणे महामार्गाने लोणावळा येथे एकविरा मंदिर परिसरात जातात. मात्र, टोलमुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, तर काहीवेळ टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांसमवेत वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे, भाविकांच्या मागणीचा विचार करुन आणि भावनांचा आदर करत खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी टोल प्रशासनाकडे टोल माफीची मागणी केली होती. त्यानुसार, खासदाराचे पत्र असल्यास ही टोलमाफी होणार आहे.