अंबरनाथ: यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अंबरनाथ नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक मंडळाचे पदाधिकारी, महिला मंडळे पारंपरिक वेशभूषेसह सहभागी झाल्याने उत्साहाला उधाण आले होते.
अंबरनाथ शहरात नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या माध्यमातून गेल्या 24 वर्षांपासून नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. स्वागतयात्रेचे यंदा 25 वे वर्ष असल्याने यंदाचे अध्यक्ष प्रमोद नाटेकर आणि समिती पदाधिकाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून स्वागतयात्रेच्या दृष्टीने प्रयत्न केले होते.
स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
आज सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी खेर विभागातील हेरंब मंदिरापासून स्वागतयात्रा सुरू झाली. शेकडोंच्या संख्येने महिला आणि पुरुष, विविध शाळांचे विद्यार्थी देखील विविध वेशभूषा साकारून स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी लाठीकाठी, दांडपट्टा तलवारबाजी, लेझीम, ढोल ताशा पथक, कोळी नृत्य, विविध सांस्कृतिक पोशाख, विविध देखावे आणि सामाजिक संदेश या स्वागतयात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. रेल्वे स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वागतयात्रा हुतात्मा चौकाकडे रवाना झाली. हुतात्मा चौकात स्वागतयात्रेची समाप्ती झाली.
आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील, विश्वजित करंजुले-पाटील, उप नगराध्यक्ष सदाशिव पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, रविंद्र करंजुले, कुणाल भोईर, आदी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.