वाहतूक नियमभंगप्रकरणी एक कोटी ३८ लाखांचा दंड जमा

९३५४ खटले निकाली

ठाणे: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ई चलान कारवाईचा दंड प्रलंबित ठेवणाऱ्या हजारो वाहनचालकांनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे सरकारच्या महसुलात भर पडली असून ई चलान दंडाचे ओझेही हलके झाले आहे.

ठाणे शहर वाहतुक शाखेच्या १८ युनिट अंतर्गत केलेल्या कारवाईत तब्बल ९३५४ खटले निकाली काढत एकूण एक कोटी ३८ लाख ५३,३०० इतका थकित ई चलान दंड वसुलण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेला दंड न भरणाऱ्या वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो. अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र पाजणकर यांच्या पुढाकाराने शनिवार १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत तडजोडीअंती एकुण ९३५४ खटले निकाली काढले असून वाहन धारकांनी एकुण एक कोटी ३८ लाख ५३,३०० रुपये थकीत दंड न्यायालयात जमा केला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुध्द मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्याकरीता वाहतूक पोलिसांकडून दंडाचे ई चलन वाहन धारकाच्या मोबाईलवर पाठवले जाते. यात दंड भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहन चालकांवर खटला दाखल केला जातो, अशी हजारो प्रलंबित प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्याची संधी दर तीन महिन्यांनी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये उपलब्ध केली जाते. त्यानुसार, थकीत ई चलान दंड भरणाऱ्या वाहन धारकांना सवलत देण्यात येते.

लोकअदालतचा हा उपक्रम केवळ दंड वसुलीसाठी नसून वाहतूक नियमांबाबत नागरीकांमध्ये सजगता यावी यासाठी आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन अनेकांचे प्राण वाचतील, शिवाय ई चलान दंडाचा भुर्दंड देखील बसणार नाही. तेव्हा, प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळुन दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन श्री.शिरसाट यांनी केले आहे.