ठाण्यातील पाणीटंचाई आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गाजला

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा विधानसभेत चर्चेत भाग

ठाणे: ठाणे शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असताना ठाणेकरांना पाणी टंचाईने ग्रासले आहे. नवीन ठाणे म्हणून विकसित होत असलेल्या घोडबंदर भागातील नागरिकांना पाणीच मिळत नसल्याचा गंभीर प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आ डॉ जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला.

अनुदान मागण्यांवरील चर्चेत भाग घेत आ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी धरण बांधण्यासाठी प्राधान्य दिले असते तर त्यांना शेकडो वर्षे नागरिकांनी आठवणीत ठेवले असते, परंतु त्यांनी रस्त्यांना प्राधान्य दिल्याचे आ. आव्हाड म्हणाले. ठाण्यातील अनेक भागांत पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाण्याच्या टाक्या बांधण्याचे मागिल विधानसभा चर्चेत आश्वासन देण्यात आले होते, परंतु कळवा-मुंब्रा मतदारसंघात एकही जलकुंभ उभारण्यात आला नाही कि त्याच्या कामाला देखिल सुरुवात झाली नाही. घोडबंदर भागात श्रीमंत लोक राहतात, त्यांना तर महापालिकेचे पाणीच मिळत नसल्याचा आरोप आ. आव्हाड यांनी केला.

ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखिल त्यांनी उपस्थित केला. शहरात शेकडो कोटींच्या रस्त्याची कामे केली जात आहेत. त्यांच्या मतदार संघातील १८ कोटींच्या चार रस्त्यांची निविदा निघाली, परंतु कामाला अजूनही सुरुवात झाली नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ठाणे शहरातील अनधिकृत बांधकाम हा ज्वलंत विषय आहे. आजही अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरु असून अनधिकृत बांधकामाला जबाबदार धरून सहाय्यक आयुक्त आणि पोलिस निरीक्षक यांच्या विरोधात कारवाई केली जाते, परंतु ठाण्यात एकाही अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आ.आव्हाड यांनी केला.