उष्णतेची मोठी लाट; मुंबईलाही ऑरेंज अलर्ट

Screenshot

हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली: मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत असतानाच आता भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार आता उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयएमडीने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उष्णतेची लाट निर्माण होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. असेच उन पुढच्या काही दिवस कायम राहिल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर यासह सर्व उपनगरीय भागात उष्णता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या आठवड्याच्या मध्यापर्यंत अशीच उष्णता कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर तसेच उपनगरात तापमानात वाढ होत आहे. हीटस्ट्रेस वाढतो आहे. त्यामुळेच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपार ते संध्याकाळ या काळात घराबाहेर पडणे टाळायला हवे.

सध्याचे उन, उष्णता पाहता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णता वाढल्याने पाणी भरपूर प्यावे. उन्हापासून स्वत:चे संरक्षण करावे. वृद्ध, लहान मुलं, बाहेर जाऊन काम करणाऱ्या व्यक्ती यांना उन्हाचा जास्त धोका आहे. दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. तसेच श्वसनासंबंधीचे आजार होऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे. पुढचे 48 ते 72 तास आव्हानात्मक असणार आहेत, असे सांगण्यात आले आहे. दुपारी कठोर मेहनतीचे काम टाळावेत. पाणी भरपूर प्यावे, असाही सल्ला देण्यात आला आहे.