आज नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमाला

दीपक करंजीकर आणि अभिराम भडकमकर गुंफणार विचार-पुष्प

ठाणे : ठाण्यातील सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा जपणारी ‘नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमाला’ यंदा १४ व्या वर्षात पदार्पण करत असून या व्याख्यानमालेचे आयोजन शुक्रवार, ६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे.

‘ठाणेवैभव’कार कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा प्रबोधनात्मक उपक्रम ठाणेकरांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला आहे. कोरोनामुळे काही काळ खंडित झालेली ही व्याख्यानमाला पुन्हा नव्या उत्साहाने सुरू होत असून या व्याख्यानमालेचे उद्घाटन ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्या हस्ते होणार आहे.

ही व्याख्यानमाला नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, पाचपाखाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेत दोन मान्यवर वक्ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत सुप्रसिद्ध लेखक दीपक करंजीकर यांचे ‘२१ व्या शतकाचे भू-राजकीय प्रश्न आणि भारत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.१५ ते ७.४५ या वेळेत प्रसिद्ध नाटककार अभिराम भडकमकर ‘चरित्र कादंबरी-इतिहास की विपर्यास?’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.

या कार्यक्रमासाठी ॲड. माधवी नाईक (अर्थ फाउंडेशन) आणि ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या व्याख्यानमालेस ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांचेही सहकार्य लाभले आहे.