वाढत्या अतिक्रमणामुळे बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका

मानवी साखळीद्वारे बांधकामांवर तत्काळ कारवाईची मागणी

नवी मुंबई: बेलापुर टेकडीवर वाढत्या अतिक्रमणामुळे भविष्यात भूस्खलन होऊन इरशाळ वाडीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील वाढत्या अतिक्रमणावर तत्काळ कारवाई करावी म्हणून पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी सकाळी बेलापूरच्या मुख्य चौकात मानवी साखळी तयार केली होती.

सेव्ह बेलापूर हिल्स फोरम आणि नॅटकनेक्ट फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भूस्खलनप्रवण उतारांवर उभ्या असलेल्या सुमारे ३० अनधिकृत बांधकामांविरोधातील प्रशासनाच्या दीर्घकालीन निष्क्रियतेचा मुद्दा मांडण्यात आला.
माहिती अधिकारात सिडकोकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बांधकामे सुमारे २.३ लाख चौरस फूट सार्वजनिक जागेवर पसरलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून जमीन सपाट केल्यामुळे टेकडीची माती सैल झाली आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगासमोर दिलेल्या पाडकामाच्या आदेशांनंतरही ही बांधकामे उघडपणे वाढत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

सिडको मुख्यालयातून स्पष्ट दिसणाऱ्या या टेकड्या आता प्रशासकीय ठप्पपणाचे प्रतीक बनल्या आहेत. त्यामुळे अनियंत्रित आणि कथित बेकायदेशीर बांधकामांपासून संवेदनशील बेलापूर टेकड्यांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणवादी संघटनांनी चळवळ उभी केली असून टेकडीवरील अतिक्रमणावर कारवाई म्हणून रविवारी सकाळी बेलापूरच्या मुख्य चौकात मानवी साखळी तयार केली होती. याआधीही पारसिक टेकडी वाचावी म्हणून दोन वेळा मानवी साखळी तयार करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.