मुरबाड: गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने सर्वत्र धुमाकूळ घातला असून आजही बिबट्याची दहशत कायम आहे. दोन दिवसांपूर्वी मुरबाड तालुक्यातील कोरावळे येथिल शेतकऱ्याच्या सहा शेळ्या मारून दोन शेळ्या नेल्याची घटना घडली आहे.
जैतु धुमाळ यांच्या शेतावरील बेड्यांमध्ये हिंस्र वन्यप्राण्याने 20 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हल्ला करून सहा शेळ्या जागीच ठार केल्या तर दोन शेळ्या ओढून नेल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.
या घटनेची वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच वनपरिमंडळ सरळगावकडील श्री. एन. टी.भांगरे, वनपरिमंडळ अधिकारी सरळगांव, श्रीमती ए. बी. घोलप, वनरक्षक माजगाव, श्रीमती के. एस. मस्के, वनरक्षक सरळगांव, श्री. जी. एस.मुसळे वनरक्षक खांडपे व वनमजूर यांनी प्रत्यक्ष स्थळावर येऊन घटनेचा पंचनामा व इतर कागदपत्रे तयार केली. मृत शेळ्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले.
या नुकसानीमुळे पीडित शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळणार असून जीवितहानी टाळण्यासाठी ग्रामस्थांना बिबट्यापासून संरक्षण व बचाव करण्यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.