नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुका
मुंबई : उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
आज मतदान झाले तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितले. ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आत्ताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळाले होते त्यांचे ते निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे. मात्र, निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी जे खर्च केले आहे त्यांची खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी ही मागणी न्यायालयाकडून मान्य झालेली नाही.
निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागतील. ही निवडणूक जवळपास 280 ठिकाणांवर होत असल्याने आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात असल्याने जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागेल. शिवाय सर्व स्ट्रॉंग रूममध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल. स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते. ती प्रक्रिया रोज 21 डिसेंबरपर्यंत पार पाडावी लागेल.